गुरुवार, ३० जून, २०१६

जिन्याची विहिर

नाती म्हटलं की डोळ्यासमोर येतात रक्ताची, मैत्रीची नाती. पण आपल्या आसपासच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यासोबतही आपले जिव्हाळ्याचे, भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशीच एक माझ्या लहानपणापासूनची माझ्या माहेरची वास्तू म्हणजे जिन्याची विहीर.
बालपणी आजी, वडील, आई, माझा मोठा भाऊ व मी असे आमचे कुटुंब. आई प्रार्थमिक शिक्षिका, (आता रिटायर्ड) वडील कुर्ल्याला प्रिमियर कंपनीत होते (आता व्हॉलेंटरी रिटायर्ड). वडिलांना ४ भाऊ व ५ बहिणी पण आत्या लग्न होऊन गेलेल्या व सगळे काका नोकरी निमित्ताने मुंबईमध्ये स्थायिक झालेले. पण केवळ वाडीची देखभाल व्हावी म्हणून वडील रोज कुर्ला ते उरण जाऊन येऊन करत. दिवसा वाडी, शेती सांभाळायची
म्हणून त्यांनी कायमची नाइट शिफ्ट स्वीकारली. ते रोज संध्याकाळी ७ ला घर सोडून मचव्याने मुंबईला जात आणि नाइट शिफ्ट करून सकाळी १० पर्यंत घरी येत. ते दुपारी १ ते ३ झोप काढत व बाकीची झोप प्रवासात घेत. ह्या वाडीशी त्यातील वास्तुंशी जुळलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांना नाईटशिफ्टचा थकावा कधी जाणवलेला वाटलाच नाही.
वडिलांनी ह्या वाडीकडे कधी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलेच नाही. भात पिकायचा तो पूर्णं वर्षभर पावण्या रावण्यांसकट सगळ्यांना पुरायचा. फळफळावळ वडील प्रत्येक सीझनला सगळ्या त्यांच्या भावंडांना मुंबईला स्वतः वाटायला जायचे. मळ्यातून जे उत्पन्न निघायचे ते वाडीचे डागडूगीकरण, गड्याच्या पगार भागवण्यापुरते असायचे.
आमची वाडी पाच एकराची होती. वाडीत शेती होती, दिवाळीत शेती कापली की हिवाळ्यात वडील गड्याच्या साहाय्याने भाज्यांचा मळा लावायचे. वाडीत फळफळावळही भरपूर होती. आंबे, फणस, चिकू, पेरू, नारळ, ताडगोळे, जांभळ, बोरं, करवंद, चिंचा, सीझनमध्ये अमाप यायच्या. माझे लहानपण जांभळा, बोरांच्या सावलीत जाऊन रानमेवा खाण्यात गेला आहे. ह्या सगळ्या झाडांना, मळ्याला, शेतीला ताजेतवाने ठेवणारी
आमच्या वाडीतील वास्तू म्हणजे आमची अनोखी जिन्याची विहीर.
वाडी माझ्या आजोबांनी घेतली होती. जेव्हा वाडी घेतली तेव्हा आधीपासूनच त्यात एक विहीर होती. विहीर १०० वर्षापूर्वीची असल्याचा दावा आहे. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे विहिरीत आत उतरण्यासाठी विहीरीच्या बाहेरून दोन खास जिने आहेत. जिन्याच्या सुरुवातीच्या कठड्यांना वळणदार नक्षी आहे.
जिने उतरले की एक त्यात एक आपण उभे राहू शकतो असा हौद आहे. त्याला कमान आहे. त्या कमानीखालच्या कट्यावर बसले की पाण्यात हात घालता येतात. विहिरीत उतरायचे असले की ह्या हौदातूनच उतरायचे. ह्या हौदाला व जिन्याला लागून दोन खांब बसवलेले आहेत. त्यावर बसता, उभे राहता येते. शिवाय हौदाचा कट्टा आहे. विहिरीच्या कडेलाच पूर्वी पाणी ओढण्याची मोट होती. ही मी कधी पाहिली नाही पण
थोरामोठ्यांच्या गप्पांत त्याचा नेहमी उल्लेख येतो. बैल जुंपून पूर्वी शेतीला मोटीचे पाणी दिले जाई.
कालांतराने सरकारची शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या पंपाची योजना आली. आजोबांनी तेव्हा तिथे पंप बसविला. पंपाला एक खोली केली. रहाटाच्या जागी एक थाळा बांधला. पंपाचे तोंड थेट पाणी साठवायच्या थाळ्यात.
थाळ्याला दोन भोगदे आहेत. त्या भोगद्यातून शेतीच्या दोन्ही दिशांना पाटाद्वारे पाणी जाते. पंपाला इतका फोर्स आहे की आपण त्या पाण्याखाली हात धरला की बॅलंस न राहता हात प्रेशरने खाली जातो. पाच एकरच्या जमिनीला ही विहीर पंपाच्या साहाय्याने हिरवीगार ठेवत होती. पावसाळ्यात विहीर पूर्ण भरायची कधी कधी हाताने पाणी काढता यायचे. जिन्याची शेवटून तिसरी पायरी शिल्लक राहील इतके पाणी
भरायचे. हौद तर दिसायचाच नाही.
विहिरीच्या थाळ्यात व आतील हौदात माझ बालपण गेल. ह्या विहिरीने माझ्याशी मैत्रीच नात जोडल होत. आमचे घर विहिरीपासून १. ५ किलोमीटरवर होते. तेव्हा घरात नळ नव्हता. शाळेत जायच्या आधीच आई व आजी दोघी विहिरीवरून पाणी भरून आणायच्या. डोक्यावर त्या हंड्यांच्या राशी आणि हातात एक कळशी असे त्या दोघींच गौळण रूप मला खुप आवडायच. मलाही मग अनुकरण करावस वाटायच. मी आईकडे पाणी भरण्यासाठी
हट्ट करायचे तेव्हा मग आई माझ्या हातात एक तांब्या द्यायची. तो तांब्या घेऊन मी आईसोबत पाणी आणायला जायचे. भांडी व कपडे आई विहिरीवरच्या थाळ्यातच धुवायची. भाऊ लहान होता तेव्हा तोही जायचा आईला पाणी काढून देण्यासाठी. कारण पंप सारखा लावता यायचा नाही. तो शिंपण्यासाठीच वापरात यायचा. मीही मग लुडबूड करायला जायचे थाळ्यात मज्जा करायला. काही दिवसांतच वडिलांनी विहिरीच्या बाजूला
एक पाण्याची टाकी बसवली व त्या टाकीचे पाणी पाईपलाईनद्वारे आमच्या घरातील नळात येऊ लागले. तेव्हापासून फक्त जेव्हा लाइट नसेल तेव्हाच आम्हाला पाणी भरण्यासाठी विहिरीवर जावे लागे. पण त्यामुळे विहिरीची संगत काही कमी नाही झाली. उलट जसजसे माझे वय वाढत गेले तसतशी ती वाढतच गेली.
उन्हाळ्यात शाळेतून आले की मी वडीलांच्या बरोबर शेतावर जात. मग वडिलांनी पंप चालू केला, त्याचे शिंपणे उरकत आले की मी थाळ्याच्या दोन्ही बाजूचे भोगदे दगडे, मोठी पाने लावून बंद करायचे. स्विमिंग पुल प्रमाणे थाळ्यात पाणी साचवून मनसोक्त डुंबायचे. गार गार पाण्यात सुरुवातीला थंडी लागायची पण नंतर सवय होऊन निघू नये असेच वाटायचे. हिवाळ्यात संध्याकाळी ह्याच थाळ्यात मग आई
कोथिंबीर, मुळा, मेथी ह्या लागवड केलेल्या भाज्यांची मुळे धुवायची. ती धुवायलाही मी मध्ये मध्ये लुडबुडायचे. आमच्या विहिरीत मासेपण होते. मधून मधून भाऊ आणि त्याचे मित्र गळ लावून मासेही पकडत. मलाही हा गळ ध्ररायला मज्जा वाटे. पण अजून एकही त्या विहिरीतील मासा माझ्या गळाला लागला नाही.
शाळेत जायला लागल्यावर माझी खेळाची अभ्यासाची आवडती जागा म्हणजे पायऱ्या उतरून गेल्यावर असणारा हौद. हौदात गेल्यावर गार गार वाटायच. उन्हाची झळ तिथे पोहोचत नाही. ह्या हौदात मी अभ्यास करायचे, खेळायचे. कविता, गाणी म्हणायचे. कधी कधी तर रुसून पण त्या हौदात जाऊन बसायचे. मी तशी पाहिल्यापासूनच धाडसी होते. भूत वगैरे मी कधी मानलेच नाही. त्यामुळे बिनधास्त एकटी बसायचे. तसेही वडील व
गडी वाडीत असायचे. ते मधून मधून मला बघून जायचे.
विहिरीच्या जवळच एक साखरबाठी ह्या जातीचा आंबा होता. हा आंबा सगळ्यात वेगळा. आकाराने लहान, ह्याचा रंग हिरवाच असायचा पिकला की फक्त नरम व्हायचा. आतून पांढराच. पिवळा रंग नव्हताच. पण चव मात्र साखरेसारखी गोड म्हणून तो साखरबाठी आंबा. ह्या आंब्याचे बरेचशे आंबे ह्या हौदात, जिन्यावर व विहिरीत पडायचे. हे आंबे गोळा करण्या साठी मी सकाळी जायचे व हौदातून, पायरीतून गोळा करायचे. विहिरीत
पडलेले आंबे लामण्याने मोठी माणसे काढायची. एखादा आंबा राहिलाच तर त्याचा वास हौदातील पाण्यात मिसळायचा. ह्या विहिरीने त्या आंब्याची मधुरात चाखली आहे. कालांतराने ते आंब्याचे झाड वार्धक्याने गेले. पण त्याच्या आठवणी अजून जिभेवर आहेत. विहिरीच्या पाण्यात मिसळलेल्या आहेत.
आमच्या वाडीत ताडाची भरपूर झाडे होती. ताडाच्या पेंडी उतरवणारा माणूस यायचा. तोच विकायला न्यायचा. पण एका वेळी एवढे ताडगोळे काढून विकणे शक्य नसायचे मग ते ताजे राहावेत यासाठी त्या पेंडी वडील विहिरीत टाकून ठेवायचे. ते टाकताना बघायलाही मला खुप गंमत वाटायची. त्या टाकल्या की अस वाटायच की आता बुडणार. पण त्या चक्क तरंगायच्या.
दिवाळी, मे महिन्याची सुट्टी म्हणजे आमच्याकडे काका-आत्यांच्या कुटुंबाची जत्राच. माझी २०-२५ चुलत भावंडे एकत्र यायची. मग काय दिवसा मुक्कामपोस्ट फक्त विहीर आणि वाडी. माझ्या वडिलांनी ह्याच विहिरीत माझ्या सर्व चुलत भावंडांना, भावाला पोहायला शिकवले. मी सगळ्या भावंडात सर्वात लहान. त्यामुळे मी बघत बसायचे. वडील त्या भावंडांना दोरी बांधायचे आणि विहिरीत उडी मारायला लावायचे.
एखादा घाबरला, उडी मारली नाही तर सरळ त्याला आत ढकलायचे. हे दृश्य मात्र मला खुप भीतिदायक वाटायचे. माझ्या भावाला वडिलांनी तो अवघा ४ वर्षांचा असतानाच पोहायला शिकवले. मलाही त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. पण एकदा अशीच सगळी भावंडे विहिरीत उतरली होती. मला वडिलांनी विहिरीत टायर वर बसवून इतर भावंडांच्या हाती सुपूर्द करून वर दुसऱ्या एका भावाला दोरीने बांधून टाकण्यासाठी
गेले. वडिलांनी त्या भावाला विहिरीत ढकलले त्याच्या उडीने पाणी घुसळून माझा टायर उलटा झाला. माझे डोके खाली व पाय वरती झाले. तेवढ्यात माझ्या आत्तेबहिणीने पाहिले आणि माझे पाय घट्ट पकडून ठेवले व वडिलांना हाक मारली. वडिलांनी लगेच विहिरीत उडी मारली व मला बाहेर काढले. त्या दिवसापासून मी कधीच विहिरीत उतरले नाही. पण आतील हौदावर बसून विहिरीत पाय सोडून बसायचे.
पुढे मी मोठी झाल्यावर वडिलांना मदत करायला मी सुद्धा शिंपण करायचे. पाटात येणारे पाणी सगळ्या शेतात, झाडांना एक एक पाट उघडून फिरवायचे. अहाहा काय धन्यता वाटायची झाडांना पाणी पाजून त्यांना जीवनदान देण्यात! गावातील लोक म्हणायचे की ह्या विहिरीला मोठे झरे आहेत. पण ते कधी मला लहानपणी दिसले नाहीत. कारण दिसायची वेळच त्या विहिरीने कधी आणले नाही. सदा त्या हौदापर्यंत भरलेली
असायची. पाच एकराच्या वाडीला पाणी शिंपूनही तिने स्वतः कधी तळ गाठला नाही.
अशी ही आमची विहीर. आम्हाला सतत साथ देणारी हिने सदैव आमच्या वाडीला आपल्या जीवनाचा पुरवठा केला आहे. भाज्या पिकवल्या आहेत, शेती पिकवली आहे, फळबागा फुलवल्या आहेत. माणसे-जनावरांची तहान भागवली आहे. आम्हाला अंगा खांद्यावर खेळवले आहे.
आता जागेच्या विभागण्या व काही काही भाग विकला गेल्याने ही विहीर आमची राहीली नाही पण त्या आठवणी अजून ओल्या आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा