गुरुवार, ३० जून, २०१६

निसर्ग सहवास

उरण मधील एका वाडीमध्ये माझे बालपण गेले. वाडीमध्ये शेतजमीन आणि मळा (भाजी पाला लागवडीसाठीची जागा). वाडीतील शेते पावसाळ्यात तांदळाच्या शेतीने हिरवीगार तर हिवाळ्यात भाज्यांनी सदा बहरलेली असायची. वाडीच्या आत वाडीच्या जीवनचक्राला जीवन देणारी भव्य जिन्यांची विहीर. वाडीच्या कुंपणाला तारेला लागून कुठे करवंदाची जाळी तर कुठे पांगारा, भेंड, खरवत, शाल्मली (काटेसावर) ची झाडे. वाडीमध्ये शेताच्या बांधावर व इतर जागी आंबा, चिंच, बोरे, जांभूळ, अस्वन अशी ऋतूनुसार रानमेव्याने लगडणारी वृक्षसंपदा.
फुलपाखरे, चतुर, टाचण्या, रानफुले, रानमेवा, विहीर, झाडे, शेती, मळे हे माझे बालपणीचे जीवलग निसर्ग सवंगडी. त्यांच्या सहवासात निखळ आनंद असायचा. वाढत्या वयानुसार आपल्याला आवडणारा प्रत्येक घटक जाणून घेण्याची चिकित्सक वृती वाढते. माझीही चिकित्सक बुद्धी माझ्या ह्या निसर्ग सवंगड्यांच्या अधिक परिचयासाठी आतुर असल्याने माझ्यावर निसर्गविषयक ज्ञानाचे सिंचन करत होती.
शालेय जीवनातील पूर्ण अभ्यासही मी झाडांच्या मायेच्या सावलीत केला. दाट झाडी असल्याने सापांच्या विविध जातींचे वास्तव्यही असायचे वाडीत. अनेकदा अभ्यास करताना मला बुजुर्ग साप दर्शन देऊन जायचे. घाबरलात ना? साप जवळ आला तर मीही घाबरले असते. जागेचे मालक म्हणायचो आम्ही त्यांना. त्यामुळे कदाचित तेही मला आपल्या जागेतली मुलगी मानून घाबरवत नव्हते. नेहमी अंतर ठेवूनच इकडे तिकडे जायचे. बर्‍याचदा मलाच दिसायचे असे साप त्यामुळे रिझल्ट लागून पुढच्या इयत्तेत गेले झाले की साप पावला असे थट्टेने सगळे म्हणायचे.
अभ्यास करून कंटाळा आला की मनोरंजनासाठी फुलपाखरे, पक्षी शोधत फिरायचे तर कधी झाडावर उंच उंच चढण्याचे प्रयत्न करायचे. माझा सगळ्यात आवडता छंद म्हणजे रानफुले जमवायचा. वाडीत वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी रानफुले उगवलेली असायची. अशी फुले गोळा करायची आणि त्यांची कधी माळ, दाराला तोरण, कधी गजरा, कधी रांगोळी घालायची. उंच दांडयांच्या फुलांचे गुच्छ बनवून ते घरातील फुलदाणीत ठेवायची. घरातील एखाद्या कोपर्‍यात कुंड्या आणुन ठेवायच्या त्यामुळे घराच्या कोपर्‍याबरोबर मनाचा कोपराही हिरवागार प्रसन्न व्हायचा.
वर्षाऋतू तर छंदांसाठी अपुराच पडे. रस्त्यावर साठणार्‍या डोफाभर पाण्यात डुबुक डुबुक करत शाळेत जाणे, घरी आल्यावर हिरव्या वासाच्या शेतीच्या कामात मिसळून शेतातील पाण्यात डुंबणे, मातीपासून खेळणी बनवणे, रस्त्यावरच्या विर्‍यातून (समुद्रमार्गी नाल्यातून) शेतात येणार्‍या माशांना गळ लावणे, रात्री काजव्यांना हाताच्या अंधार्‍या ओंजळीत घेऊन त्यांचे अद्भुत दिवेलागण न्याहाळणे, शेजार्‍यांकडून किंवा शाळेतील मैत्रिणीकडून त्यांच्या कडे असणार्‍या वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या आणून आपल्याकडे लावायच्या आणि त्याला कोवळे कोंब फुटून जीवनदान कधी मिळते हे पाहण्याचा माझा सगळ्यात आवडता आणि आतापर्यंत जोपासलेला छंद. कुठल्याही फुलाच्या झाडाला त्याच्या नव्या कोंबातून कळीचा छोटासा कण दिसणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असायचा आणि अजूनही आहे.
हिवाळ्यात शेती कापून झाली की लगेच भाज्यांच्या मळ्यांची लगबग चालू व्हायची. पेरलेले बियाणे उगवताना, त्यांची क्रमा क्रमाने होणारी वाढ पाहताना, त्याला फुल-फळ धरलेले पाहताना मन निसर्ग लिलयेत हरपुन जात असे. हिरव्या गार कोथिंबीरीच्या गालिच्यावर हात फिरवताना थंड सुगंधी स्पर्श जाणवायचा. लगडलेली वांगी, मिरच्या खुडताना त्यांच्या आकारांचे बारकावे पाहायला मिळायचे. टोमॅटोच्या शेतात शिरले की टोमॅटोच्या रोपांचा विशिष्ट वासाने मन धुंद व्हायचे. लांबलचक टोमॅटोच्या शेतातले लालबुंद टोमॅटो काढून जाडे मीठ बारीक करून शेताच्या बांधावर बसून ताजे ताजे खाण्यात, नवअलकोल-कोबीच्या शेतातील कोवळा नवअलकोल तिथेच सोलून खाण्यात, शेतातील तिखट मुळा मीठ लावून खाण्यात, चवळीच्या कोवळ्या शेंगा कचाकचा खाण्यात, अगदी बारीक कोवळ्या भेंडी, तोंडली झाडा-वेलीवरून खुडून खाण्यात जो आनंद अनुभवला आहे तो अविस्मरणीय आहे.
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे निसर्गाच्या अधिक सानिध्याची पर्वणी. आमच्याकडे चुलत भावंडांचीही सुट्टीत रेलचेल असायची. मग त्यांच्यासोबत झाडाच्या सावलीत खेळ, भातुकली मांडली जायची. उन्हाळ्यात ही मोठ मोठी झाडे सावली आणि थंड वार्‍याने आपली माया पाझरायची. जांभूळ, करवंद, बोर, चिंचा, कैर्‍या-आंबे असा रानमेवा भरभरून कौतुकाने पुरवायची. त्यामुळे बाहेरचे फास्टफूड हानीकारक पदार्थ खाण्यात नसायचे.
निसर्गाबरोबर इतके नाते घट्ट झालेले त्यामुळे लग्न झाल्यावरही सासरी वाडीतील निसर्गाचा सहवास साथ देत आहे. झाडा पक्षांच्या सहवासामुळे मुलिंनाही त्यांची गोडी लागत आहे.
परीसरातील परिस्थिती नुसार आवडी-निवडी बदलत जातात. आताच्या पिढीला निसर्ग कमी अनुभवायला मिळतोय कारण बर्‍याच निसर्गनिर्मित जागेवर राहणीमानाच्या गरजेनुसार कॉन्क्रीटीकरण होत चालले आहे. हवेशीर मोकळ्या मैदानाची जागा आता बंद खोलीतल्या टेबलावरच्या टी.व्ही, कॉम्प्युटरने व हाताच्या पंज्यात मावणार्‍या मोबाइलने घेतली आहे. बहुतांश कुटुंबात आई-वडील दोन्ही व्यावसायिक, नोकरदार असल्याने अपुर्‍या वेळेमुळे वाघ-सिंह, जंगलाच्या गोष्टी कालबाह्य होत चालल्या आहेत. अर्थात ह्याला बहुतांश पालक अपवाद असणारच. तसेच ह्या पिढीला निसर्गाचे आकर्षण नाही असे मुळीच नाही, फक्त ही कला जोपासण्याची त्यांना वाट मिळत नाही. म्हणून मुलांना व त्यांच्या पालकांना सांगणे आहे की ज्यांच्या कडे मोकळी जागा नाही त्यांनी महिन्यातील किंवा वेळ मिळाल्यास आठवड्यातील एखादा तरी सुट्टीचा दिवस जवळच्या बागेत, समुद्रावर एखाद्या रम्य ठिकाणी फेरफटका मारून निसर्गातील प्रत्येक घटकाची आपल्या मुलांना ओळख करून द्या.किशोरवयात हातांमध्ये काही प्रमाणात बळ आलेले असते. आपल्या परीसरात किंवा जे बिल्डींग मध्ये राहतात त्यांनी बिल्डींगच्या इतर लोकांना त्रास होणार नाही ही काळजी घेऊन आपल्या गच्चीत, बाल्कनीत कुंड्यांमध्ये रोपे लावण्यासाठी करा. कुंड्यांच्या खाली पाणी खाल पक्षांसाठी टेरेसवर पाणी ठेवून तहानलेल्या पक्षांना तृप्त होऊ द्या. त्यामुळे पाण्याचे व त्याच्या बचतीचे महत्त्वही कळते. घरातील थोडेसे दाणे पक्षांना देऊन काय आनंद मिळतो पहा. थोडे शेअरींग निसर्गाबरोबरही होउद्या. निसर्ग घटकांची काळजी घेताना तुमचे आपोआप त्यांच्याशी नाते घट्ट होईल. मग ह्यांचा सहवास तुम्हाला सुखावेल. तुमचे मन चंचल न होता प्रफुल्लित झालेलं असेल. झाडावर उमललेले फुल किंवा फळ पाहताना होणारा आनंद तुम्हाला टी.व्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलवचा गेम जिंकण्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटेल.

(झुंजार मत २०१५ या दिवाळी अंकात हा लेख प्रकाशीत झाला आहे.)

1 टिप्पणी:

  1. छान लिहिलंय. पण आपल्या अक्षरांचा टाईप आणि रंग बदलावा. रंग पूर्ण काळा करावा.

    उत्तर द्याहटवा