बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

आगरी गझलकार डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड



जातीने आगरी नसले तरी आचरणाने आगरी संस्कृती अंगिकारणारे, आगरी गझलकार डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड यांना सलाम.


सन १९६६ साली डॉ. कैलास गायकवाड यांचे वडील श्री सोमनाथ गायकवाड हे आपल्या कुटुंबासह पालघर जिल्ह्यातून प्रार्थमिक शिक्षकाच्या नोकरीच्या निमित्ताने नेरुळ गावी भाड्याची जागेत राहायला आले. नेरूळ गाव हे बहुसंख्य आगरी जातीतील कुटुंबांचे गाव. कैलास यांचा जन्म १९७६ साली त्यांच्या आजोळी कल्याण येथे झाला. बाळ कैलास आणि आई सुमन यांनी माहेरचे कोडकौतुक पुरवून घेऊन पुन्हा आग्री कुटुंबांच्या सहवासात नेरूळच्या राहत्या घरी आले.

बालपणापासूनच त्यांच्यावर आगरी समाजातील संस्कार घडत गेले. आगरी राहणीमान, भाषा,चालीरीती, संस्कृती या सगळ्यांची कैलास यांच्या आयुष्यावर छाप पडत गेली. शेजार-पाजारच्या आगरी समूहानेही ह्या गायकवाड कुटुंबाला आपलेसे करून घेतले. गावातील आगरी कुटुंबांतील प्रत्येक सणवार, घरगुती कार्यक्रमांमध्ये मायेने ओथंबून भरलेल्या आग्री कुटुंबांनी कैलास यांच्या कुटुंबाला आपल्यातीलच मानून मान-सन्मान दिला. गायकवाड कुटुंबही आवडीने ह्या कार्यक्रमांत सहभागी होऊ लागले व त्यामुळे त्यांचे एकमेकांचे ऋणानुबंध घट्ट होऊ लागले. पालघर जिल्ह्यातील वातावरणही काहीसे असेच शेती, गावासारखे असल्याने व अशाच माणसांसारखे असल्याने गायकवाड कुटुंबाला आगरी समूहात वावरताना कधी परकेपणा जाणवला नाही व आगरी लोकांनी कधी जाणवून दिला नाही.  डॉ. कैलास मोठे होत गेले तसे आजूबाजूच्या आगरी समूहात मिसळू लागले. कैलास हे नेरूळमधीलच शाळेत शिकल्याने त्यांचे शाळेतील व गावातील मित्रमंडळीही आगरीच होते.
त्यावेळी नेरूळ किंवा नवी मुंबई विकसीत झालेली नव्हती. वाशीच फक्त थोडीफार सुसज्ज झालेली होती. गावातील होळी, पालखी, जत्रा, जत्रेच्या वेळी तरवा काढणे या सगळ्यात गायकवाड कुटुंब सामील होत असे. कैलास लहान असताना त्यांची आई त्यांना शेजारच्या आगरी मैत्रिणींच्या सल्ल्याने कैलास यांना भक्तिणीकडे न्यायची तिथे उतारा केला जायचा किंवा विबूत दिली जायची त्यामुळे गायकवाड कुटुंब व कैलास नेरुळच्या आगरी वसाहतीच्या प्रत्येक बाबीशी एकरूप झाले होते. त्यावेळी आपल्या गावातील आगरी मित्रांसोबत कैलास खाडीत मासे पकडायला जायचे, मिठागरात जायचे, मऊ चिखलात खुबे पकडायला जायचे, म्यालवना म्हणजे सुकी लाकडे गोळा करायला जायचे, गोवऱ्याही थापायचे. गावात कोणाचे घर बांधायचे असेल तर सगळे मित्र मिळून बांधकामाला मदत करायचे. अंगण करायला मदत करायचे त्यामुळे ते नेरूळ गावातील माती, खाड्यांशीही एकरूप झाले होते. असे हे सवंगडी एकत्र बागडताना त्यांची मनेही एकमेकांत गुंतत गेली.मैत्री अधिक फुलत गेली. कुणीही कुणाच्याही घरी हक्काने जाऊन गप्पा मारायचे, खेळायचे. कायम आगरी कुटुंबाच्या सहवासात राहून कैलास आणि त्यांच्या आई-वडिलांनीही आपली मूळ भाषा सोडून कशी व कधी आगरी भाषा आत्मसात केली हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. कैलास व त्यांचे आईवडील हे घरात आगरी भाषेतच एकमेकांशी बोलतात हे मला आगरी भाषेला सोन्याचे दिवस आल्यासारखे वाटते. डॉ. कैलास यांनी आपले लग्नही आगरी पद्धतीतील रीतीभाती पूर्ण करूनच केले. त्यांच्या  पत्नीनेही आगरी भाषा आत्मसात केली व त्यांची मुलगीही आपोआपच करणार. 

कैलास साधारण सातवीत होते तेव्हा नवी मुंबईत सिडको मार्फत वसाहती बांधण्यास सुरुवात झाली, गावांच शहरीकरण चालू झालं. नेरुळगावतही ठेकेदार येऊ लागले काही गावातलेच ठेकेदार झाले, सप्लायर झाले मग त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीला कैलासही मित्रांसोबत सुट्टीच्या दिवशी जात असत. हळू हळू इमारती झाल्या मग लोक राहायला येऊ लागले, कॉलनी संस्कृती वाढीस लागली. नेरूळ व लगतच्या गावांचे शहरीकरणात स्थित्यंतर होताना पाहणारे कैलास हे साक्षीदार आहेत व गावा पासून शहरीकरणाचा प्रवास कैलास यांनी अनुभवलेला आहे.

कैलास यांना लहानपणीच वाचनाची आवड निर्माण झाली होती कारण त्यांचे वडील व भाऊ त्यांना वाचनासाठी चांदोबा, चंपक अशी पुस्तके आणून द्यायचे. तसेच शाळेत  होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्येही नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तके बक्षीस म्हणून देत असत. कैलास यांना दरवर्षी बक्षीस मिळायचे व ही पुस्तकेही कैलास वाचून काढायचे. कैलास यांची वत्कृत्वकलाही बहरत होती. त्यांनी १ ली ते १० वी पर्यंत वत्कृत्व स्पर्धेतील बक्षीस घेण्यात बाजी मारली. पुढे पुढे कैलास यांना वाचनाची इतकी सवय झाली की ते पुस्तकांचा फडशा पाडू लागले. रामायण, महाभारत, बायबल कुराण असे धार्मिक ग्रंथ म्हणा की बाबा कदम, बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक अशी पुस्तके वाचल्याने त्यांच्या ज्ञानडोहाची पातळी वाढू लागली.


कैलास यांचे शालेय जीवनशिक्षा विद्यामंदिर नेरुळ इथे चालू होऊन विद्याप्रसारक हायस्कूल बेलापूर, मॉडर्न महाविद्यालय वाशी पर्यंत येऊन त्यांनी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथून एम. बी. बी. एस ची डिग्री घेतली. आता कैलास यांच्या नावा अगोदर डॉक्टर ही पदवी जोडली गेली. डॉ. कैलास यांची प्रथम प्रार्थमिक आरोग्य केंद्र साई-माणगाव या रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. २००३ सालापासून ऐरोली, कोपरखैरणे अशा ठिकाणी अपघात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देऊन ते सीबीडी येथे नागरी आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले.

डॉ. कैलास हे मनमिळावू व दुसर्याच्या हाकेला नेहमी धावून जाणारे आहेत. आपले कार्य सांभाळत डॉ. कैलास समाजाचे भान राखून समाज सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. कर्मकांड, बुवाबाजी, धर्माच्या नावाखाली माजवले जाणारे चुकीचे अवडंबर, अंधश्रद्धा याविरोधात ते आहेत. त्यांचा विज्ञानावर विश्वास आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला या कामामुळे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा सहवास त्यांना लाभला याचा त्यांना अभिमान आहे.


डॉ. कैलास यांनी विविध आरोग्य शिबिरे, जनजागृतीपर व्याख्याने केली. आमच्या उरणच्या इनरव्हिल क्लब ऑफ उरण च्या माध्यमातून २ वेळा गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणी (पॅप्समियर) केली ज्याचा अनेक महिलांनी लाभ घेतला. ही शिबिरे घेत असताना डॉ. कैलास स्वतःचा कधीही प्रचार करत नाहीत किंवा स्वतःची वाहावाह ही करून घेत नाहीत.





निःस्वार्थी, निर्व्याज भावनेने ते आपली सेवा जनतेला देत असतात. गुजरात राज्यातील अंकलेश्वर या इस्नोट गावात त्यांनी १४ जणांच्या टीम सोबत १४ दिवसांचे शिबीर भरवले होते ज्याचा जवळपास ८००० रुग्णांनी लाभ घेतला. त्यात ४०० हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्या, खुब्याच्या सांधा बदलण्याची शस्त्रक्रिया केली गेली.नेरूळ बेलापूर या शाळांची वैद्यकीय जबाबदारी डॉ. कैलास यांच्यावर होती. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी जीवन प्रशिक्षण शिबिरे घेतली. एच. आय. व्ही. सारख्या समस्येवर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम केले. ७ एप्रिल ला जागतिक आरोग्य दिनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रत्येक केडर - श्रेणीला समाविष्ट केले जाते त्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण डॉ. कैलास यांनी केले व त्यामुळे नवी मुंबई मनपा आयुक्तांसह उपस्थित आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्याकडून त्यांनी वाहवा मिळवली. सन २०१०-२०११ या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेचा उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. सी. बी. डी. च्या नागरी आरोग्य केंद्राचा ब्लॉग बनवून आंतरजालावर प्रकाशीत करणारे ते पहिले वैद्यकीय अधिकारी असून त्याची दखल टाईम्स ऑफ इंडियाने विशेष वृत्तांताद्वारे घेतली.


डॉ. कैलास यांना लेख, कविता गझल लिहिण्याचा छंद आहे. आपल्या छंदाच्या निर्मिती बद्दल डॉ. कैलास सांगतात श्री अण्णा त्रिभुवन हे गझलकार त्यांच्या दवाखान्यात येत असत. ते डॉ. कैलास यांना नेहमी वाचताना पाहायचे व त्यांनी डॉ. कैलास यांची साहित्या प्रती गोडी ओळखली. त्यांनी त्यांच्याकडील एक गझल चे पुस्तक डॉ. कैलास यांना वाचायला दिले व काही गझलही त्यांना ऐकवीत होते पण थोड्या वेळाने डॉ. कंटाळले व त्यांनी कंटाळा आल्याचे अण्णांना बोलून दाखवले त्याने श्री अण्णा त्रिभुवन रागावले व म्हणाले प्रसुती समयी एक एक कळ जशी आईला लागते तशी एक एक ओळ गझलेची निघते. त्यानंतर त्यांनी डॉ. कैलास यांना चॅलेंज केले की मी एक गझलेची ओळ देतो तुम्ही ७ दिवसांत दुसरी लिहून दाखवा. ती ओळ होती "चेहऱ्याची चांगली ही रीत नाही" त्यानंतर डॉ. विसरून गेले पण ७ दिवसांनी श्री अण्णा त्रिभुवन आले आणि त्यांनी गझलेची ओळ पूर्ण झाली का विचारले. डॉ. कैलास यांनी त्यांच्याकडे थोड्या वेळाची मुदत मागितली व लगेच दुसरी ओळ तयार करून दिली.

चेहऱ्याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दुःख तो लपवीत नाही.

अण्णांना ही ओळ खूप आवडली व त्यांनी डॉ. कैलास यांचे कौतुक केले व गझल पूर्ण करून नित्य गझल लिहिण्यासाठी प्रेरित केले. त्यानंतर ही गझल पूर्ण करून डॉ. कैलास यांनी सुरेश भट वेबसाइटवर ती प्रकाशीत केली. नंतर ते लेख, प्रवास वर्णन, कविता, गझल लिहून मायबोली, मनोगत, ऐसी अक्षरे अशा आंतरजालावरील वेबसाइटवर प्रकाशीत करू लागले. मायबोलीवर त्यांनी गझलांचे उपक्रमही घेतले. हे सगळे लिहिताना त्यांच्या ऋदयस्थानी दडलेल्या आगरी बोलीभाषेत आपण का लिहू नये असा विचार आला आणि त्यांनी २०११ साली पहिली आगरी गझल एका ज्वलंत विषयावर लिहिली "पलाट साडेबाराचा". ते अत्यंत आनंदाने सांगतात की आगरी भाषेत कोणीही गझल लिहिलेली पाहण्यात नव्हती. आग्री भाषेतील गझलेला जन्म डॉक्टर कैलास यांनी दिला. सन २०११ साली गोव्याला घनश्याम भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली गझल संमेलन झाले होते त्यात बहुभाषिक मुशायऱ्यात सर्वप्रथम पलाट साडेबाराचा ही आगरी गझल डॉ. कैलास यांनी सादर केली. त्या गझलेला संमेलनात प्रचंड प्रतिसाद मिळाला. ती गझल पुढील प्रमाणे.


भानगरींना कारन झाला,पलाट साडेबाराचा
शिरकोचा म्होटा घोटाला,पलाट साडेबाराचा

कंचे व्यावारान दलाली,आवरि नय गवनार कवा
डिलींग मधला म्होटा गाला,पलाट साडेबाराचा

धा मजल्याचा टॉवर झाला,गावाचे त्या बाजूला
मिनी चरवला पयला माला,पलाट साडे बाराचा

लाईट ,पानी ,रस्ता सगला कॉलनीन रानार्‍यांना
आमचे दारासमोर नाला,पलाट साडेबाराचा

चिकन्,मटन्, दारु ना मच्छी,बायेरचे मित्रांसाठी
खोपटान ठेवू बापाला,पलाट साडेबाराचा

जमीन नाही,पलाट नाही,किती किती मी सहन करु?
तरास आपापले जिवाला,पलाट साडेबाराचा

धरुन ''कैलास'' या जगानी,बाप कुनाला बनेवला
व्हता कुनाचा,लाभ कुनाला,पलाट साडेबाराचा.

--डॉ.कैलास गायकवाड.

डॉ. कैलास यांनी १९ आगरी व्यक्तीवर ' बटवा ' हा व्यक्तिचित्रण संग्रह लिहिला आहे. कळवा,बेलापूर पट्ट्यांतील आगरी समाजातील सामाजिक, आर्थिक, नैतिक स्थित्यंतरे दर्शविणारी जतर ही कादंबरी डॉ. कैलास यांनी खुबीने लिहिली आहे. त्यांचा अस्वस्थ प्रतिबिंब हा गझल संग्रह प्रकाशीत झालेला आहे. गजलोत्सव, अखिल भारतील गझल संमेलन विशेषांक, मराठी गझल - सुरेश भटांनंतर, मुस्लिम मराठी संमेलन विशेषांकात त्यांच्या गझल प्रकाशित झाल्या आहेत.

आगरी संस्कृतीबद्दल बोलताना डॉ. कैलास म्हणतात मी पाहिलेली आग्री संस्कृती ही मातृसत्ताक आहे. घरात आई ही मुख्य असते. ती पूर्ण घराची जबाबदारी सांभाळते. आईच घरातील सगळ्या कार्यक्रमाचीही सूत्र हाती घेते. आगरी कुटुंबातील वडील किंवा मुलगा आपली मिळकत आणून आईकडे देतात व आई खर्चाचे नियोजन सांभाळते. आईला प्रत्येक कार्यात मान असतो. लग्न, पूजा, शेतीच्या नांगरणीची, पेरणी, धान्याच्या पूजेला आईला पहिला मान असतो. आगरी संस्कृती महिलांचा  सन्मान करणारी आहे. विविध सण, कार्यक्रमातील त्यांच्या रिती पर्यावरणाला धरून आहेत. डॉ. कैलास म्हणतात आग्री लोक हे रांगडे, रोखठोक, हातच न राखून बोलणाऱ्या गुणवैशिष्ट्यासकट मोकळ्या मनाचे, प्रेमळ आहेत. ते वडील किंवा शिक्षकांना एकेरी संबोधत असले तरी त्यामागे त्यांची भावनिक जवळीक आहे. जीवनाचे सार सांगणारे आगरी बोलीभाषेत काही शब्द आहेत ते अन्य कोणत्याही भाषेत नाहीत असे डॉक्टर म्हणतात. या बोलीतील स्मशानगीते, धवलगीते खूपच भावणारी आहेत. 


तर असे हे डॉ. कैलास सोमनाथ गायकवाड हे जन्माने आगरी नसले तरी त्यांना आगरी लोकांबद्दल अत्यंत जिव्हाळा आहे व ते आपले  समूहाबाबतच आदर, जिव्हाळा आपल्या लेखणीतून व्यक्त करत आहेत. त्यांना अनेक बारकावे ह्या बोलीभाषेबाबत ज्ञात आहेत. त्यांच्या हातून आगरी समूहाच्या कौतुकाचे अमर्याद लेखन होवो व त्यांनी आचरणात आणलेला आगरी बाणा त्यांच्या आयुष्यात प्रगतीची, सुख-समाधान-समृद्धीची बरसात करू दे ही शुभकामना. 

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण (कुंभारवाडा)
prajaktamhatre.77@gmail.com

अग्रसेन २०१९ दिवाळी अंकात प्रकाशित.






रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

सणावारांची बाजारपेठ

काही दिवसांपूर्वी बाजारपेठेलगत असलेल्या हॉस्पिटलमध्ये किरकोळ आजारामुळे एक दिवस राहण्याचा योग आला. आम्ही ज्या खोलीमध्ये होतो, त्या खिडकीतून बाहेर बाजारपेठेत चाललेली वर्दळ, खरेदी-विक्री, भाज्या, फळे पाहत विरंगुळा होत होता. दुसर्‍या दिवशी पहाटे उठले आणि खिडकीजवळ गेले, तर अगदी भकास वाटू लागले. फक्त कोरडा रस्ता दिसत होता. ना फळे, फुले, ना भाज्या, ना लोकांची गर्दी. पहिल्यांदाच बाजारपेठेला अस बिनाअलंकार पाहिले आणि अस्वस्थ वाटले. पण हा अस्वस्थपणा थोड्याच वेळात दूर झाला. हळूहळू दुकानदार, रस्त्यावरचे गाडीवाले, भाजीच्या टोपल्या घेऊन बसणार्‍या बायका असे आपआपल्या जागी जमू लागले. स्वतःच्या जागेची झाडलोट चालू झाली, रस्त्यावर पाणी शिंपडणे चालू झाले. धंदा चांगला व्हावा म्हणून अगरबत्त्या लावून प्रार्थनापूर्वक पूजाही होत होत्या. त्या अगरबत्त्यांचा धूर हवेत मंद एका सुरात वाहत होता. हे सगळे दृश्य पाहून मला सकाळची भूपाळी आठवत होती. आता प्रसन्न वाटू लागले होते. एकीकडे पिवळ्या केळ्यांची गाडी, तर कुठे कांदे-बटाटे, कुठे लाल लाल टोमॅटो तर कुठे सगळ्या हिरव्या पालेभाज्या, कुठेतरी मध्येच डोकावणारी फुले, शेंदरी गाजर, मक्याची अर्धवट सोलून ठेवलेली मोत्यासारखी कणसे, डाळिंब, संत्री, पेरू, चिकू अशी विविधरंगी फळे रचत रस्त्याला रंगीबेरंगी साजशृंगार चढला. थोड्याच वेळात गिर्‍हाईकही चालू झाले. खरेदी-विक्री दरम्यानची संभाषणे चालू झाली आणि हळूहळू मार्केट नेहमीसारखे आपलेसे वाटू लागले.

बाजार म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग. आमच्या उरणमध्ये भाजी मार्केट, मच्छी मार्केट, फूल मार्केट आहेच शिवाय रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या दुकानांसमोर रोज फळे, भाज्या, फुले. ऑफिसला जाताना लागणारा मार्केटचा देखावा मला नेहमीच आवडतो. फळे, फुले, किराणा, औषधे, मासे, कपडे, करमणुकीच्या विविध वस्तू, खेळणी, भांडी अशी अनेक दुकाने मार्केटमध्ये कित्येक वर्षे आपले बस्तान बांधून नांदत असतात. गिर्‍हाईक हाच देव मानून दुकानदार व्यवहारामार्फत गिर्‍हाइकाची सेवा करत असतात.
सणासुदीच्या दिवसांत मार्केटमध्ये जाणे मला जास्त आवडते. प्रत्येक सणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये बाजारात दिसत असतात. चैत्र महिन्यातील गुढीपाढव्याला साखरेच्या माळांनी मार्केटला गोडवा आलेला असतो. हल्ली छोट्या गुढ्याही दुकानांत नटून सजून बसलेल्या असतात. फूलवाल्यांकडे झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आलेले असते.
ज्येष्ठातली वटपौर्णिमा सुवाशिणींचा सण. ह्या सणाला बाजारपेठेत फणसाच्या राशी लागतात. फणस कापून गरे विकणाऱ्याभोवती तर बायकांचा गराडाच असतो. नवीन नवऱ्यांसाठी लागणाऱ्या परड्या बुरूड बायका विकत असतात. नवीन नवऱ्यांच्या आया आपल्या मुलीची ओवश्याची परडी तिच्या आयुष्यात सुखाचे दान मिळावे म्हणून मनोभावे खरेदी करताना दिसतात. ओवशात लागणारी फळे ही त्या हंगामाचीच असतात - म्हणजे फणस, जांभूळ, करवंदे, आंबा, अळू ह्या फळांना बाजारात मान असतो आणि ह्या मानाला साजेसे त्यांचे भावही चढलेले असतात. जोडीला केळी, चिकू अशा फळांच्याही कॉलर टाईट असतात. खण-नारळांच्या सामानालाही उधाण आलेले असते. आजकाल वडाच्या फांद्यांनी तर बाजार भरलेला दिसतो. पण त्याऐवजी वडाच्या झाडाची रोपे विकायला येऊन ती दारोदारी लावली जावीत व ज्यांना शक्य नाही त्यांनी वडाच्या चित्राची पूजा करावी, जशी देवतांच्या प्रतिमेची केली जाते, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे जेणेकरून वडाच्या झाडांना हानी पोहोचणार नाही.
आषाढातल्या एकादशीला बाजारात साक्षात जणू पांडुरंगच प्रसन्न असतो. जास्त गडबड गोंधळ नसतो, पण जागोजागी भुईमुगाच्या शेंगा, अळूच्या मुळ्या, कोनफळ, रताळी अशी मातीतली कंद वारीत आल्याप्रमाणे विठोबाच्या रंगात मिसळलेली दिसतात.
श्रावण महिन्यात बाजारपेठेतही 'श्रावणमासी हर्ष मानसी' वातावरण असते. जागोजागी रानभाज्यांची हिरवळ पसरलेली असते. नागपंचमीला नागाच्या सुबक मूर्ती फणा काढून दर्शन देत असतात. नागोबाला वाहण्यासाठी लागणाऱ्या वेली जुड्यांमध्ये जणू पदर खोचूनच बसलेल्या असतात. राखीबंधनाच्या राख्यांची हंगामी दुकाने रंगीबेरंगी, विविध आकारातील राख्यांनी सुशोभित झालेली असतात. थोड्याच दिवसांत येणाऱ्या गोकुळाष्टमीसाठी सजलेल्या हंड्या नटखट कान्हा दही चोरताना डोळ्यासमोर आणतात.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोश! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तरांचा व उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फूलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नि दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरणांनी, माळांनी घराघरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडीची दुकाने गणेशभक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते. गणेशमूर्तीही बाजारातील दुकानांमध्ये आपापल्या मेकअपवर फायनल टच मारून मखरात विराजमान होण्यासाठी तयार होत असतात.
आश्विन महिन्यातली नवरात्र बाजारपेठ झगमगीत करते. जागोजागी देवीसाठी लागणारे पूजेचे सामान, रंगीबेरंगी दांडिया आणि गरब्याचे चमकदार आणि उठावदार असे रंगीत घागरे यांनी बाजारपेठेत फेर धरलेला असतो. ह्या दिवसांत उपवासासाठी मोठमोठाले भोपळे ठिय्या मांडून बसलेले असतात. अगदी आजीबाईच्या भोपळ्याच्या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
कोजागरी पौर्णिमेचा चंद्रही बाजारपेठेत आपल्यासाठी आज काय गंमत आहे हे डोकावून नक्की पाहत असेल. प्रत्येक घरात किंवा सोसायटीत कोजागरीनिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी खास मेनू आखले जातात. त्यात मसाला दूध हे तर नैवेद्य म्हणून चंद्राचे प्रतिबिंब आपल्यात सामावून घेण्यासाठी आतुर असते. ह्या दिवशी सकाळीच दूध आणून ठेवावे लागते. संध्याकाळपर्यंत बाजारात दुधाचा तुटवडा झालेला असतो. किराण्याच्या व खाऊच्या दुकानांमध्ये मसाला दुधाच्या मसाल्याच्या लहान-मोठ्या डब्यांना ह्या दिवशी खास मान देऊन पुढे आणलेले असते. भाजी मार्केटमध्ये उकडीच्या शेंगा, रताळी असे सामान भरपूर आलेले असते.
आपल्या घरात जसा दिवाळीचा उत्साह असतो, तसाच उत्साह बाजारपेठेत असतो. काही ठिकाणी उटण्याचा सुगंध दरवळत असतो. जागोजागी विक्रीसाठी ठेवलेल्या रंगीबेरंगी कंदिलांमुळे बाजारपेठ सजून जाते, तर रात्री तारका अवतरल्यागत बाजारपेठ झगमगून जाते. ठिकठिकाणी फटाक्यांची दुकाने व त्याभोवती बालगोपाल आपल्या पाल्यांसह फटाके घेताना त्यांच्या चेहर्‍यावर फुलबाजे फुललेले दिसतात. पद्धतशीर लावलेल्या रांगोळ्यांच्या ढिगांनी बाजारपेठेला रंगांनी न्हाऊन टाकलेले असते. लक्ष्मीपूजनाच्या, पाडव्याच्या आगमनासाठी झेंडूच्या फुलांचे डोंगर रचलेले असतात. तोरणे, माळा बाजारपेठ अधिक सुशोभित करत असतात. लक्ष्मीपूजन म्हणजे खरा दुकानाचा सण. प्रत्येक दुकानाभोवती रांगोळ्या वेगवेगळ्या नक्षीकामात मिरवताना दिसतात. झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांची तोरणे चैतन्यमय वातावरण निर्माण करतात. ह्या दिवशी दुकानात पूजेचा थाट असतो. हिशेबाच्या वह्यांसकट दुकानाची पूजा होते. रात्री फटाक्यांची आतशबाजीने बाजारपेठ दुमदुमून जाते.

Photo-Collage-20191022-202823223



कार्तिक महिन्यातील बलीप्रतिपदेसाठी नवीन झाडू बाजारपेठेत आपले स्थान उंचावतात. भाऊबीजेसाठी भांड्यांची, कपड्यांची आणि भेटवस्तूची दुकाने सामानाने आणि माणसांनी तुडुंब भरलेली दिसतात. सगळ्या भावाबहिणींची माया त्या भेटवस्तू रूपात ओथंबून भरलेली दिसते.
कार्तिकी एकादशी हा कार्तिक महिन्यातील विठोबाच्या भक्तीने भरलेला सण म्हणजे आषाढ महिन्याच्या बाजारपेठेचेच प्रतिबिंब.
पौष महिन्यात येणारी मकरसंक्रांत पुन्हा बाजारपेठ भरगच्च करते. ओवसा देण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू घेऊन विक्रेते जागोजागी बसतात, बऱ्याच ठिकाणी तीळगूळ, साखरफुटाणे, हळद, कुंकू असे सामान मिरवत असते. ह्या दिवसांतली मातीची छोटी सुगडी लहान मुलांसाठी खास आकर्षण असते. अ‍ॅष्टर, शेवंती, गुलाब अशा फुलांनी फूलमार्केट बहरलेले असते. खायची पाने, गाजर, ऊस, हरभरा, बोरे यांनी मार्केटमध्ये राज्य मिळवलेले असते आणि हे सगळे खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, उत्साह ओसंडलेला दिसतो.
फाल्गुनातली होळी म्हणजे रंगांचा सण. होळीच्या दहा दिवसांपूर्वीपासूनच दुकानांत लहान मुलांसाठी पिचकाऱ्या लटकवलेल्या दिसतात. रंगांच्या राशींनी पूर्णं बाजारपेठेला रंगीबेरंगी स्वरूप आलेले दिसते.
जीवनावश्यक सगळ्या वस्तूंचा पुरवठा मार्केटमध्येच तर असतो. विचार करा, आठ दिवस मार्केट बंद राहिले तर आपली काय अवस्था होईल? किती घट्ट नाते असते आपले ह्या मार्केटशी.
रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला मार्केटचा भक्कम आधार असतो. मला कुठल्याही बाजारपेठेत गेले की नेहमी ताजेतवाने वाटते, कितीही मरगळ आली असेल तरी बाजारपेठेतील एक चक्कर ती मरगळ घालवून एक उत्साही वातावरण निर्माण करते. मग त्यासाठी पैसेच खर्च करावे लागतात असे काही नाही. एखाद्या प्रेक्षणीय स्थळाप्रमाणे ह्या बाजारपेठेला मारलेली चक्करही मन प्रसन्न करते.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे, उरण.
(हा लेख मिसळपाव या ई दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रकाशित झालेला आहे. अंक पाहण्यासाठी  लिंक क्लिक करा. https://www.misalpav.com/node/45490)